….तर मेंदूचं भिरभिरं होईल !

दिनांक: ३ मार्च, २०१८

बालरंजन केंद्राच्या सुजाण पालक मंडळात अतिशय नाविन्यपूर्ण आणि पालकांना उपयुक्त अशा विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जातात. ह्या महिन्यात सौ. आशा उमराणी यांनी “ माहितीची स्थूलता /  information obesity ” या विषयावर मार्गदर्शन केले. जयकर ग्रंथालयात ग्रंथपाल राहिलेल्या आशाताईंचा पहिल्यापासूनच माहितीच्या खजिन्याशी संबंध आला.

“ शरीराची स्थूलता आपल्याला माहित आहे. त्यावर डायट हा उपाय आहे. पूर्वी शतकानुशतके अन्नपदार्थांची कमतरता होती. आता मात्र अन्न भरपूर आहे. सहज उपलब्धता, हाताशी पैसा आणि कमी कष्टात मिळणाऱ्या अन्नाच्या मुबलकतेमुळे, सहाजिकच त्याचे जास्त सेवन केले जाते. परिणामी स्थूलता वाढते. ओबेसिटी हा रोग नाही पण त्यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते. हीच परिस्थिती सध्या माहितीबद्दल होत चालली आहे.” असे उमराणी म्हणाल्या.

“ प्रथम रेडीओ नंतर टी.व्ही. आणि आता तर २४ तास रतीब घालणाऱ्या शेकडो वाहिन्या ! त्याद्वारे माहितीचा सतत मारा आपल्यावर होत असतो. त्याच्याबरोबर आपण वाहवत जातो आणि त्यानुसार आचरण करतो.हे फार भयंकर आहे. मुले तर या भासमय दुनियेत आपला अमूल्य वेळ घालवतात, भरकटत जातात. यामुळे भविष्यात ती अनेक शारीरिक व मानसिक रोगांची शिकार होण्याचा धोका आहे.” असा इशारा त्यांनी पालकांना दिला.

“ मानवी मेंदू एकावेळी एकच गोष्ट प्रोसेस करू शकतो. त्यावर अनेक गोष्टी आढळल्या तर मेंदूचे भिरभिरं होतं. ह्यावर उपाय म्हणजे ‘माहितीचं डायट’. त्याद्वारे स्वतःवर बंधने घालणं महत्वाचं असल्याचं त्या म्हणाल्या.” जगण्याला अन्नाप्रमाणे माहितीचीही गरज आहे. ती प्रचंड उपलब्धही आहे. पण त्याच्या आहारी न जाता मुलांना मैदानी खेळांची गोडी लावा, त्यांना ग्रंथवाचनाकडे वळवा. ‘इन्फर्मेशन डायटीशियन’ हे नवीन करिअर तुमच्या मुलांसाठी उपलब्ध राहील.आपल्या माहितीच्या गरजा कशा ओळखायच्या याबाबत ते मार्गदर्शन करतील.” असे त्यांनी सांगितले.

“ माहितीच्या स्थूलतेतला फोलपणा प्रथम पालकांना उमजायला हवा म्हणजे ते आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकतील.यासाठी हा प्रश्न अधिक गंभीर होण्यापूर्वीच त्या विषयावर पालकांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.” असे बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.

दीप्ती कौलगुड यांनी आभार मानले.

माधुरी सहस्रबुद्धे व आशा उमराणी

माधुरी सहस्रबुद्धे व आशा उमराणी